मिशन बिगिन अगेनमध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान लक्षात घेऊन हा उद्योग परत सुरू करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगून मुंबई व शहरांतील हॉटेल्स कोरोना युद्धात सोबत आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन केले. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स, लॉजेस सुरु करण्यापूर्वी काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले.
“मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स या करोना युद्धात आमच्याबरोबर आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. यासाठी हॉटेल व्यावसायिकांची दुहेरी जबाबदारी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.