‘शरद पवार हे मॉडर्न अफझलखान’, ‘महाराष्ट्राचे खरे शत्रू शरद पवारच’ अशी पवारांना लक्ष्य करणारी अनेक शीर्षके सामानात छापून आली आहेत. त्याच पवारांचा आता शिवसेनेला व सामनाला पुळका कसा आला, असा सवाल करत भाजप नेते खा. नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात कौरवांचे राज्य असून या गलथान कारभारावरून लक्ष विचलित करण्यासाठी शरद पवार यांची मुलाखत घेतली असेही त्यांनी म्हटले आहे.
सत्तेचा दर्प चालत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस हे शांत स्वभावाचे आहेत आणि ‘मी पुन्हा येईन’ या म्हणण्यात घमेंड नाही तर आत्मविश्वास आहे, असे नमूद करत राणे म्हणाले, शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे व त्यांचा आदर ठेवूनच मी बोलत आहे, असे सांगताना त्यांनी ‘सामना’ची जुनी कात्रणे पत्रकार परिषदेत झळकावली.
सामनात नेहमीच पवारांवर टीका झाली. बाळासाहेब, उद्धव ठाकरे यांच्यासह राऊत यांनीही पवारांवर टीका केली. ‘पवारांना लक्ष्य करणारी अनेक शीर्षके सामानात आली त्याच पवारांचा आता शिवसेनेला आणि सामनाला पुळका कसा आला, असा सवाल नारायण राणे यांनी केला.