नाशिक : एकीकडे करोनाच्या विळख्यात महाराष्ट्र राज्य सापडले असताना, दुसरीकडे आज नाशिकमध्ये हृदय पिळवटून टाकणारी एक वाईट घटना, महापालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात घडली. नाशिकमध्ये आज दुपारी १२ च्या सुमारास, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात असलेल्या एका मोठ्या ऑक्सिजन टाकीतून, प्रचंड प्रमाणात वायू गळती होऊन, तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. दोन ते अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही वायू गळती थांबवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.
या घटनेनंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर आपली शोकमग्न प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्घटनेस जे कुणी जबाबदार असतील त्यांची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र शोकमग्न आहे!
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/l4cBfMOxEO— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2021
तसेच, “करोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत करोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे ऑक्सिजन नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे, अशी प्रतिक्रियी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.
आज सकाळच्या सुमारास रुग्णालयाच्या मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नादुरुस्त असल्याने, त्यातून गळती सुरू झाली. ही गळती रोखण्यासाठी जेव्हा तंत्रज्ञ कारागीर दाखल झाले आणि दुरुस्तीचे काम सुरू झाले, त्याचवेळेस नादुरुस्त कॉक पूर्णपणे तुटला. त्यांनतर ऑक्सिजन टाकीतून मोठ्या प्रमाणात वायू गळती होऊन, तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.