सिंधुदुर्ग : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर, मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. या संतापाच्या लाटेला शांत करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यभर दौरा सुरु केला. तसेच, त्यांनी राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना मराठा समाजाला आरक्षणाची किती नितांत गरज आहे आणि हा मुद्दा कसा महत्वाचा आहे हे सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार आता चांगलेच अडचणीत सापडले असून, आत्तापर्यंत या प्रश्नावरून सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी देखील ठाकरे सरकारसमोर मांडलेल्या ५ मागण्यांसाठी, सरकारला ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. आज ते तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी परत एकदा ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. तसेच, यावेळी त्यांनी पंतप्रधानांवरही भाष्य केले आहे.
“पंतप्रधानांवर नाराजी असण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. मला त्यांनी नेहमीच योग्य सन्मान दिला आहे. त्यांनी मला राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून राज्यसभेत नेमलं आहे. मात्र, असं असलं तरी, एक खासदार म्हणून मला माझ्या भावना मांडणं चुकीचं वाटत नाही,”अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली आहे. “मोदी मला उद्यादेखील भेटीसाठी वेळ देऊ शकतात, मात्र हा वैयक्तिक भेटीचा प्रश्न असून, समाजाचा प्रश्न आहे. मला सगळ्या खासदारांना घेऊन त्यांना भेटायचं आहे,” असं देखील संभाजीराजे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अनेक वेळ मोदींकडे वेळ मागूनही त्यांनी मला वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली होती. मात्र, आता आपण पंतप्रधानांवर नाराज नाही, असे सांगत त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Read Also :
- शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल कायद्याच्या कचाट्यात; न्यायालयाने सुनावली सहा महिन्यांची शिक्षा
- गुजरातला हजार कोटींची मदत केलीत, महाराष्ट्राला तुम्हाला वाटत असतील तेवढे तरी द्या!
- “विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात” अतुल भोसले
- ‘मी कोविडयोद्धा म्हणून बाहेर पडावसं वाटत असेल, तर माझ्या ५ मागण्या आधी पूर्ण करा’
- ‘आरक्षणप्रश्नी कोणासोबतही चर्चेला तयार, फक्त समोरच्यांनाही एकच सूचना…’