सरकारने 31 जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करु, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यावेळी त्यांनी गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचंही सांगितलं. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ३१ जुलैनंतर लॉकडाउनच्या मुदतवाढीला प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार विरोध केला आहे.
‘शासनाने लोकांच्या वागणुकीवरुन परिस्थिती समजून घ्यावी. लोकांना ज्या-ज्या वेळी संधी मिळाली त्यावेळी त्यांनी फिजीकल डिस्टन्सिंगची आयशी तैशी केली. यातून त्यांनी आम्ही एकत्र आहोत हे दाखवून दिलं. लॉकडाऊनच्या मानसिक त्रासाची जाणीव लोकांना झाली आहे. त्यामुळे 31 जुलैनंतर लॉकडाऊन वाढला, तर वंचित बहुजन आघाडी शासनाच्या विरोधात जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी सरकारला दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “आमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आता आम्हाला फक्त लॉकडाऊन मोडावा लागेल. दानदात्यांची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे आता तरी शासनाने लोकांना मदत करावी. 31 जुलैनंतर राज्यात लॉकडाऊन वाढवू नये. अन्यथा रस्त्यावर उतरुन याला विरोध करु. सरकार गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवतंय. मात्र, ती भीती आम्हाला दाखवायची नाही. माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी आहे.’
‘मी स्वतः कोविडची टेस्ट करुन घेतली आहे. राज्य सरकारने आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व लोक प्रतिनिधींची कोविड टेस्ट करुन घ्यावी. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, त्यांना शासनाने क्वारंटाईन करावं. मात्र, ज्यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे त्यांना फिरायला रानमोकळ करावं,’ असंही ते म्हणाले. मी उत्सुकतेपोटी कोरोना टेस्ट केली आहे. कोणी विचारलं तर प्रमाणपत्र दाखवता येतं, असंही ते मिश्किलपणे म्हणाले.