मुंबई : देशभरात महामारीने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातदेखील अशीच परिस्थिती असून, याचा मोठ्या फटका आरोग्य यंत्रणेला बसत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर, बेड्स, लस यांची राज्यात कमतरता जाणवत आहे, मात्र यावरून राज्यात विरोधक आणि राज्य सरकारमध्ये टीका, आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
यातच राज्यातल्या परिस्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली असून, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘सध्या करोना कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. जे काही जाहीर करायचं असतं, ते अजित पवारच जाहीर करतात. अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
तसेच अजित पवारांवर निशाणा साधताना, अजित पवार मला बरेच दोष असणारे मंत्री वाटतात. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असताना, “अजित पवार म्हणतात की, रेमडेसिविर राज्य शासन आयात करणार आहे, पण शासनाला तसे अधिकारच नाहीत. त्यामुळे अजित पवार कोणत्या अधिकाराने बोलत आहेत?,” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, देशात १ मेपासून लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत १८ वर्षांच्या पुढील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. तसेच, अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली असून, राज्यात मात्र ठाकरे सरकारकडून अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून, संभाव्या मोफत लसीकरणाच्या श्रेयासाठी अनेक उलट सुलट विधानं केली जात असल्यामुळे, मोफत लसीकरणाला घेऊन एकूणच गोंधळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.