जम्मू : गेल्यावर्षी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर अनेक प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवले होते. त्यानंतर आता एका-एका नेत्यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. कलम 370 हटवल्याच्या एका वर्षानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी पहिली राजकीय बैठक घेत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांच्यासह पुत्र ओमर अब्दुल्लादेखील उपस्थित होते.
आपल्या नागरिकांना त्यांचे हक्क परत दिल्याशिवाय आपण मरणार नसल्याचे म्हणत, पाकिस्तानात जा म्हणणाऱ्यांना देखील त्यांनी यावेळी सडेतोड उत्तर दिले आहे.
फारूख अब्दुल्ला म्हणाले की, आम्हाला पाकिस्तानात जायचे असते तर आम्ही 1947 मध्येच गेलो असतो. त्यावेळी आम्हाला थांबवणारे कोणीही नव्हते. परंतु आम्ही भारतात राहण्याचा निर्णय घेतला आणि हा देश आमचा आहे. आमचा देश हा महात्मा गांधींचा देश आहे, भाजपचा नाही.
आपल्या लोकांचे हक्क जोपर्यंत मी परत मिळवत नाही, तो पर्यंत मी मरणार नाही… मी येथे लोकांचे काम करण्यासाठी आहे. ज्या दिवशी माझे काम संपेल त्या दिवशी मी येथून निघून जाईन, असेही यावेळी फारूख अब्दुल्ला म्हणाले.