नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळले आहेत, तर काल दिवसभरात तब्बल ३ लाख ९२ हजार ४८८ नवीन महामारीने बाधित रुग्णांची नोंद झाली होती. दुसरीकडे ३४१७ जणांचा महामारीमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा हा २ लाख १८ हजार ९५९ इतका झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, भारतात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. महामारीसाठी उच्चाटनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला असून, त्यामुळे देशात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार, महामारीची साखळी तातडीने तोडण्याची गरज आहे. आरोग्य व्यवस्थेसाठी ही परिस्थिती हाताबाहेर गेली असून, महमरीच्या संसर्गाची स्थिती अशीच वाढत्या पद्धतीने राहिली, तर आरोग्य व्यवस्था पूर्णतः ढासळेल. एकमेकांच्या संपर्कात आल्याने हा विषाणू फैलावतो. त्यासाठी या विषाणूची साखळी तोडावी लागणार आहे. परिणामी देशात लॉकडाऊन लागू केल्यास ही साखळी तोडण्यास मदत होईल. तसेच बधित होणाऱ्या रुग्णांच्या आकड्यातही घट होईल, असं कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, देशात महामारीने बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, लॉकडाऊनसाठी पंतप्रधान मोदींवरील दबाव वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरज पडल्यास लॉकडाऊन करावा, अशी सूचना केली आहे. मात्र, त्यापूर्वी दुर्बल घटकांची योग्यप्रकारे सोय करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.