मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आज आपत्ती व्यवस्थापनाही बैठक पार पडली या बैठकीत अंतिम परीक्षांच्या बाबतीत देखील निर्णय झाला. “अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्य सरकारची भूमिका कायम आहे. महाराष्ट्रात परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे केंद्रानेही या भूमिकेला समर्थन द्यावे,” अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंतिम वर्षाच्या परीक्षेवरुन राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असे चित्र पाहायला मिळत आहे. यूजीसीच्या पत्रानंतर काय निर्णय घ्यायचा यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. त्यात उदय सामंत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत राज्य सरकारची भूमिका कायम आहे. त्यामुळे परीक्षा घेणं शक्य नाही. ज्यांना परीक्षा द्यायची आहे. त्यांनाही संधी देऊ,” असे उदय सामंत म्हणाले.
जी भूमिका आम्ही यापूर्वी घेतली होती, ती कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापनाची यापूर्वी झालेली बैठक आणि आताची बैठक या कालावधीत कोरोनाची स्थितीत आणखी वाढली आहे. राज्यात 12 हजारपेक्षा जास्त कंटेन्मेंट झोन आहेत. तिथे 1 कोटीपेक्षा जास्त लोक आढळले आहेत. कोरोनाची आकडेवारी बघितली आणि कुणाचा आग्रह असेल तर ते विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही,” असे उदय सामंत म्हणाले.