मुंबई ; फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली. आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवार योजनेची पाठराखण केली आहे. कॅगनं ताशेरे ओढल्यानंतर ठाकरे सरकारनं फडणवीसांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवारच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यानंतर ठाकरे सरकारनंही जलयुक्त शिवारमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला.
जलयुक्त शिवार योजना ही अत्यंत चांगली आणि लोकहिताची आहे. त्यांनी चौकशी लावावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. जलयुक्त शिवारची कामं ही लोकांनी केलेली योजना आहे. बीड जिल्ह्यामध्ये लोकांना फायदा झाला आहे. तसेच पंकजा मुंडेंनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री पत्रप्रपंचावरही भाष्य करणं टाळलं.
राज्यपालांवर मी टिप्पणी करणार नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दोघेही एकमेकांना आता उत्तर देऊन झाले आहेत. मी आता त्यावर काय भाष्य करणार, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे.
तसेच गेल्या काही दिवसांपासून खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही पंकजा मुंडेंनी भाष्य केलंय. खडसे पक्ष सोडतील, असं मला वाटतं नाही. ही फक्त चर्चा आहे. जसा एखादा नेता पक्षात आला तर फायदा होतो, तसाच सोडून गेल्यावर नुकसान होतं, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
मराठा आणि ओबीसी आरक्षणावर त्या म्हणतात, मराठा समाजाची घोर निराशा झाली. बाजू मांडण्यास पूर्ण टीम अपयशी ठरली आहे. आरक्षणामुळे समाजांमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत. ओबीसी समाजाचीसुद्धा चिंता वाढली आहे, तो हवालदिल झाला असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
जोरदार पावसानं झालेल्या नुकसानीवरही त्यांनी ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बांधावर जावं, मी जेव्हा बोलते तेव्हा संपूर्ण सरकारविषयी बोलते, जलदगतीने निर्णय घ्यावा. राज्यभराच्या बांधावर जाऊ शकत नाही हे मान्य, पण बांधापेक्षा शेतकऱ्यांपर्यंत निर्णय पोहोचणे महत्त्वाचं असल्याचंही पंकजा मुंडेंनी अधोरेखित केलं आहे.
Read Also :
सुड उगवण्यासाठी फडणवीसांची चौकशी, आधी शिवसेनेच्या मंत्र्यांची चौकशी करा: रामदास आठवले https://t.co/BvLsY1By01 @RamdasAthawale
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020