अभिनेत्री कंगना रानौतच्या मुंबईतील पाली हिल्सस्थित कार्यालयात 9 सप्टेंबर रोजी मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामाचे कारण देत तोडफोड केली होती. त्यानंतर कंगनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, बीएमसीची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती पालिकेने माहिती अधिकारात दिली आहे.
आरटीआयला हा खुलासा झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रनोट हिने बुधवारी ट्विट करुन पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. कंगनाने ट्विट केले, ‘माझ्या घरातील बेकायदेशीर तोडफोडीसाठी मनपाने आतापर्यंत 82 लाख रुपये खर्च केले आहेत. पप्पांच्या पप्पूने एका मुलीला डिवचण्यासाठी जनतेचा पैसा खर्च केला, आज महाराष्ट्र या ठिकाणी उभा आहे, अत्यंत दुर्दैवी’, असे कंगना म्हणाली आहे.