राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याने शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून 20 जुलैपासून दैनंदिन मालिकेद्वारे दिले जाणार आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या मालिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) या संस्थेच्या सहकार्यातून आणि ‘एमकेसीएल नॉलेज फांउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही शैक्षणिक मालिका सुरू केली जात आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणी संचावर या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या मालिकेचे नाव ‘टिलीमिली’ असे ठेवण्यात आले आहे. ‘टिलीमिली’ मालिका ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित असणार आहे.
दररोज प्रत्येक इयत्तेच्या एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे 60 पाठ 60 दिवसात 60 एपिसोडमध्ये सादर केले जातील. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे 6 दिवस हे एपिसोड प्रसारित करण्यात येणार आहेत. त्यामुळे ‘टिलीमिली’ मालिका सलग दहा आठवडे प्रसारित केली जाईल.