अमरावती: युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने अवैध ठरवल्याने. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. नवनीत राणा या २०१९ साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या हेविवेट नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. कोर्टाने जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने, राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची याचिका शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेत राणांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवले आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली. पण, खरंच त्यांची खासदारकी रद्द होइल का? याबाबत आम्ही कायदेतज्ज्ञांकडून जाणून घेतले.
काय आहे प्रकरण?
नवनीत राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. पण, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा होता. तसेच अमरावतीची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र, नवनीत राणा यांनी आजोबांपासून सर्वांचे जात प्रमाणपत्र खोटे बनविले असल्याचा आरोप करत आनंदराव अडसूळांनी न्यायालयात धाव घेतली होती. शेवटी आता हे प्रकरण निकाली काढण्यात आले असून हा संविधानिक घोटाळा असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. तसंच त्यांना २ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे.
राणांची खासदारकी रद्द होणार?
नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र रद्द होइल की नाही, याबाबत कायदेतज्ज्ञ असिम सरोदे सांगतात, ”राणा यांना सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा ते वापर करू शकतात. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होण्यावर देखील स्थगिती येऊ शकते. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, तर त्यांची खासदारकी आणखी काही काळ टिकेल. ठरवून नागरिकांचा विश्वासघात केल्याचं हे प्रकरण आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यासाठी हे कारण पुरेस आहे. अशा प्रकरणांमध्ये लगेच कारवाई करता येऊ शकते. त्याबाबतचे सर्व अधिकारी निवडणूक आयोगाला असतात. पण, खासदार नवनीत राणा यांची ज्या पक्षासोबत सलगी आहे, ते या प्रकरणाकडे मुद्दाम दुर्लक्ष करून त्यांना वेळ देखील देऊ शकतात. त्यामुळे त्यांची खासदारकी सध्या रद्द होईल, असे वाटत नाही.”
खासदारकी रद्द झाल्यास सिमा सावळे आणि आनंदराव अडसूळ यांच्यात लढत होणार का?
सीमा सावळे यांचे मुळगांव अमरावतीमधील दर्यापूर आहे. लग्न आणि राजकीय कारकिर्दीमुळे त्यांची ओळख पिेंपरी चिंचवडची रणरागिणी म्हणून झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेवर सीमा सावळे यांनी दोन वेळा शिवसेनेकडून तर एकवेळा भाजपच्या टिकीटावर नगरसेविका पद भूषविले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सीमा सावळे पुर्णत: वेलसेटल झाल्या आहेत. दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या टिकीटावर दर्यापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक होत्या. परंतू, भाजप-शिवसेना युतीमुळे दर्यापूर मतदारसंघ शिवसेनेच्या राखीव ठेवण्यात आला. अशावेळी सीमा सावळे यांनी अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरला. परंतू, प्रतिस्पर्ध्यांच्या लढ्यात सीमा सावळेंना यश मिळाले नाही. आगामी अमरावती निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यास शिवसेनेकडून उभे असलेल्या आडसूळांविरुद्ध लढण्यासाठी भाजप सीमा सांवळे यांना माहेरी पाठवण्यास मदत करणार का? की अन्य उमेदवाराला उभे करणार?, भाजपने मदत केल्यास सीमा सावळे विरुद्ध आनंदराव आडसूळ यांच्यात होणाऱ्या लढतीमध्ये कोणाचे पारडे जड ठरणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.