मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे, तर दुसरीकडे यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून, राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे सुरू केले आहे. अनेक नेत्यांनी यावर आपली मतं व्यक्त करून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे, तसेच न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीमी सायंकाळी साडे आठ वाजता जनसंवाद साधला. यावेळी त्यांनी, पदरी निराशा आली आहे, पण संयम सोडू नका, लढाई संपलेली नाही, असे आवाहन मराठा समाजाला केले.
यावेळी त्यांनी, न्यायालयाने निकाल देताना दुसरीकडे आपल्याला दिशादेखील दाखवलेली आहे, असे सांगत, “आता मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय हा राष्ट्रपती किंवा केंद्र सरकारचा अधिकार असून, ज्याप्रकारे ॲट्रॉसिटी, काश्मिरचे ३७० कलम हटवणे किंवा शहाबानो प्रकरणात केंद्र सरकारने संवेदनशीलता दाखवली. त्याचप्रमाणे या संदर्भात देखील दाखवावी असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले आहे.
तसेच, आपण उद्या पंतप्रधांनाना पत्र देत असून, यासाठी आपण प्रसंगी पंतप्रधानांची भेटही घेऊ असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत प्राप्त झाली आहे, त्यावर ज्येष्ठ विधिज्ञ सखोल अभ्यास करत असून यात आणखी काही पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत का याची तपासणी ही केली जाईल असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान त्यांनी, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची लढाई लढताना राज्य शासन कुठेही कमी पडले नाही. उच्च न्यायालयात ज्या वकिलांनी लढाई जिंकली, तेच वकिल सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची आणि मराठा आरक्षणाची बाजू मांडत होते. परंतु तरीदेखील न्यायालयाने राज्याच्या या निर्णयाविरोधात आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, ही स्पष्टोक्ती देखील मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिली.