मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेस सोबत लढणार असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी दोन्ही बाजूंच्या नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची नुकतीच एक गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर युतीसंदर्भात कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातूनही कॉंग्रेस दिल्लीतील नेत्यांची मनधरणी करण्यासाठी दिल्लीत जाणार असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून मिळत आहे. मागील काही निवडणुकीत मुस्लिम, दलित मतं दुरावली असल्याने ते पुन्हा आपल्या पारड्यात पाडण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्न करीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
राज्यात सध्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस युतीचं सरकार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष सोबत लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मुंबईतील कॉंग्रेसचे मतं कमी झाल्याने यावेळी कॉंग्रेस मोठ्या ताकदीने लढण्याची शक्यता आहे. यासाठी कॉंग्रेस मोठी मागणी करण्याची शक्यता आहे. परंतु ते शिवसेनेला मान्य नसणार, हे विधीलिखित आहे. यावरून शिवसेना आणि कॉंग्रेसचं सुत जुळणार नसल्याने कॉंग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. त्यासाठी कॉंग्रेसकडून वंचितसह रिपब्लिकन सेनेसोबतही चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आंनदराज आंबेडकर यांच्याशीही भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आगामी महिन्यात राज्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या प्रमुख शहरासोबत 15 महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तसेच 210 नगरपरिषद, 10 नगर पंचायती आणि 1930 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार ते पहाणं महत्त्वाचे असणार आहे.