पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाआघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यावर आता स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी महाआघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र ही चुकीची धारणा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असे प्रफुल्ल पटेल गोंदियामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या होत्या. यानंतर या सरकारमध्ये समन्वय नाही, मतभेद आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे, हे खरे आहे. मात्र, मुंबईत आयुक्तांच्या अंतर्गत या बदल्या झाल्या होत्या. त्यांच्या बदल्यांच्या पत्रावर मंत्रालय किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्वाक्षरी नव्हती. तसेच या बदल्या महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना न दाखवता या बदल्या झाल्या होत्या.
तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याच्या चर्चा वारंवार होतात. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय समिती आहे, असे त्यांनी सांगितले.