कोलकाता : संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या प. बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने, भाजपचा दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. प.बंगालमध्ये भाजपनं आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, मात्र तिथे भाजपाला केवळ ७७ जागाच मिळाल्या, तर दुसरीकडं ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंतच्या सर्वात जास्त २१३ जागा मिळाल्या आहेत.
दरम्यान, राज्यात तृणमूलची सत्ता तिसऱ्यांदा आणून दिलेल्या ममता दीदींना, नंदिग्राममध्ये मात्र भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. आता या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका ममतांनी घेतली आहे.
याबाबत ममता म्हणाल्या की, मी पराभव स्वीकारते, मात्र मी न्यायालयात जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी गैरप्रकार करण्यात आले आहेत. मी त्याचा पर्दाफाश करेन. मी नंदिग्रामसाठी खूप मोठा लढा दिला आहे. ठीक आहे. हा नंदिग्राममधील जनतेचे कौल आहे. तो आम्हाला मान्य आहे, मला मान्य आहे. राज्यात आम्ही जास्त जागा जिंकल्या असून, भाजप ही निवडणूक हरला आहे”, अश्या प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
निवडणूक आयोगाकडून चारे राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुका २७ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत घेतल्या गेल्या. या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे, तर बंगालमध्ये एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भाजपने मजल मारली आहे.