मुंबई : राज्यात महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आघाडी सरकारने १ जून पर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू केला आहे. याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर देखील झाला असून, सरकारने या कारणास्तव काही परीक्षा रद्द केल्या आहेत, तर काही पुढे ढकलल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर वैद्यकीय परीक्षा होणार की नाही आणि झाल्या तर त्या कुठल्या आणि कश्या पद्धतीने घेणार, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक संभ्रम होते. मात्र, ‘वैद्यकीय लेखी आणि तोंडी परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन पद्धतीने घेणे नियमानुसार संयुक्तिक ठरत नाही. तसेच, न्यायालयानेही त्याला परवानगी दिलेली नाही, यामुळे सुरक्षित वातावरणात १० जून पासून या परीक्षा होणार असून, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केद्रिंत करावे. याबाबतीत अधिष्ठाता तसेच, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना त्या संदर्भाने मार्गदर्शन करावे,’ अशी सूचना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.
‘सध्या महामारीच्या प्रादुर्भावाची परिस्थिती आहे, हे जरी खरे असले तरी, विद्यार्थी आणि पालकांनी ही सोशल समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्णतः काळजी घेतली जाईल. प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयांनी केले आहे,” असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच, परिस्थितीव पाहता या परीक्षा रद्द कराव्यात अशीमागणी होणे साहजिक आहे, मात्र वैदयकीय महाविदयालयाकडून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे भविष्यात डॉक्टर म्हणून जनतेच्या सेवार्थ दाखल होणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे हे संयुक्तिक ठरत नाही. शिवाय उच्च न्यायालयाने देखील ही बाब नाकारल्याने, परीक्षा घेणे अनिवार्य आहे. मागच्या वेळी देखील हेच संकट असताना, महाराष्ट्र आरोग्य विदयापीठाने परीक्षा यशस्वीरीत्या घेतली असून, तशीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक काळजी घेऊन या परीक्षा पार पडतील,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.