आटपाडी तालुक्यात एक ऑगस्ट रोजी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे .या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,शिवसंग्राम पक्ष,भारतीय जनता किसान मोर्चा,रयत क्रांती संघटना व इतर शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.
दूध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान द्या. शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये थेट त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करा अथवा गाईचे दूध ३० रुपये लिटर दराने खरेदी करा. या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे आटपाडी तालुका अध्यक्ष विलासराव काळेबाग,भाजपा सोशल मीडियाचे सांगली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव सरगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णुपंत अर्जुन,हरिदास गायकवाड,प्रभाकर पुजारी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रामध्ये गाईचे दूध १.१० कोटी लिटर दूध, म्हैशीचे 20 लाख लिटर दूध व इतर १० लाख लिटर दूध उत्पादन होते. राज्यातील एकूण गाय व म्हैशीचे १.४० कोटी लिटर दूध उत्पादन होते. 35 टक्के दुधाची खरेदी सहकार व शासनाच्या माध्यमातून होते.65% दुधाची खरेदी खाजगी उद्योजक करतात. पिशवीबंद दुधाची विक्री 60 लाख लिटर,तर लूज व बायप्रोडक्शन २० लाख लिटर, दूध भुकटीसाठी 50 लाख लिटरच्या आसपास दूध लागते. दुधाचा भाव सध्या 25 रुपये ते 20 रुपयेपर्यंत खाली आलेला आहे.
राज्याचे दुधाचे उत्पादन 1 कोटी 40 लाख लिटर इतके आहे. राज्यात रोजचा दुधाचा वापर 50 लाख लीटर होतो.रोजच्या विक्रीत 35 टक्के घट झाली आहे. प्रोडक्टची विक्री 70 टक्केने कमी झाली आहे .एक कोटी दहा लाख लिटर दूध बटर चीज व पावडर करण्यासाठी वापरले जाते.एक कोटी दहा लाख लिटर पैकी 90 टक्के दुधाची पावडर होते.पन्नास हजार मेट्रिक टन दूध पावडर राज्यात शिल्लक आहे.दोन लाख मेट्रिक टन दूध पावडर देशात शिल्लक आहे. एक लाख मेट्रिक टन पावडर आपल्या देशात दरवर्षी वापरले जाते. अशी माहिती या पत्रकार परिषेद देण्यात आली.