गेल्या अनेक दिवसांपासून देशातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच सण आणि उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन सरकारक़डून करण्यात आलं आहे. दरम्यान, ईदही साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. ईदसाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली होती. या नियमावलीला एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी विरोध केला आहे.
“करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियम आम्हालाच का? ५ ऑगस्टचा राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही प्रतीकात्मरित्या करायला सांगा,” असे एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील म्हणाले.
“करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठरवण्यात आलेलेले नियम आमच्याचसाठी आहेत का?,” असा सवाल त्यांनी केला, “गर्दी टाळण्यासाठी आम्हाला निर्देश देण्यात येत आहेत. हेच नियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागू होत नाहीत का? त्यांनीदेखील ५ ऑगस्ट रोजीच्या राम मंदिराच्या भूमिपूजनचा कार्यक्रम दिल्लीतून प्रतीकात्मकरित्या करावा,” असं म्हणत जलील यांनी पंतप्रधानांवरही निशाणा साधला.
तसेच ईदच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदी विक्री करण्याचं आवाहन शासनानं केलं आहे. यावरून जलील यांनी सरकारवर टीका केली आहे. “ज्यांना शक्य असेल ते ऑनलाइन पद्धतीनं खरेदी विक्री करतील. परंतु एक दोन जनावरं असलेल्यांनी काय करावं? नेत्यांकडे अधिकाऱ्यांकडे स्मार्टफोन असतात. परंतु गरीबांकडे ती सोय नसल्यानं त्यांचा विचार कोण करणार? जनावरांची विक्री करून दोन पैसे मिळवणाऱ्यांचा विचार कोणी करायचा?,” असे सवाल त्यांनी केले.