भाजपने नुसते आंदोलन न करता केंद्राकडूनही निधी आणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.
राज्यात दूधाला 10 रुपये अनुदान जाहीर करावे यासाठी भाजपकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. राज्यात ठिकठिकाणाहून या आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठींबा दर्शविला आहे. दुध रस्त्यावर ओतून तर कुठे दुधाने अभिषेक करून सरकारचा तीव्र निषेध केला जात आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी या आंदोलनावरुन बच्चू कडू यांनी भाजपला चिमटा काढला आहे. ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तेथे दुधाला किती भाव देण्यात येतो हे लक्षात घ्या. केवळ राजकारण करु नये, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच आंदोलन करतांना केंद्रातून निधी कसा आणता येईल याकडेही लक्ष दिले पाहिजे. या देशात केंद्र सरकारात आपण आहात. केंद्राने फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये. भाजपची जिथे जिथे सत्ता आहे तिथे आपण दुधाला किती भाव देतो हेही तपासले पाहिजे, फक्त राजकारण करायचं म्हणून आंदोलन करु नये, असे बच्चू कडू म्हणाले.