औरंगाबाद : मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणारे पत्र औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.
शासनाने तातडीने गंगापूर-खुलताबाद मतदारसंघासह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच, नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी बंब यांनी केली आहे.
आमदार प्रशांत बंब यांनी यांनी पत्रात लिहिले की, गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कधी कोरडा, तर कधी अतिवृष्टी, तर कधी निसर्गाचा लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेती कशी करावी असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने अपेक्षेप्रमाणे उत्पन्न येईल, असे वाटत होते. मात्र गेल्या 10-12 दिवसांपासून माझ्या गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात तसेच मराठवाड्यात सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.
अतिपावसामुळे आता कपाशी, सोयाबीन मोसंबीच्या शेतात पाणी साचले आहे. तर ऊस, मका, बाजरीची पिकं आडवी झाली आहेत.अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकाची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.