नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीवरील भोंग्याबाबतच्या भुमिकेचा फटका शिर्डी येथील साईबाबा मंदिराला देखील बसला आहे. गुरुवारी शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील पहाटेची काकड आरती स्पीकरविना पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने सकाळी 6 ते रात्री 10 या वेळातच ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याची मुभा घालून दिली आहे. यावर मात्र मुस्लिम समाजाने नवा आदर्श दाखवत, मशिदीवरील पहाटेचं अजाण होणार नाही, परंतु साईबाबाची काकड आरती होऊ द्या, कशी मागणी त्यांनी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी भाष्य केले आहे.
मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या या भुमिकेमुळे रोहित पवारांनी म्हटलं आहे की, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. इथल्या जनतेच्या रक्तात ती भिनलीय. ती सर्व राजकारणी मंडळींनाही समजावी, हीच श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच पंढरपूर मधील विठ्ठलाच्या मंदिरावरील ध्वनीक्षेपकाचा वापर मर्यादेत होण्याची शक्यता आहे.
भोंगा वादामुळे मशिदीवरील पहाटेची अजाण बंद झाली तरी चालेल परंतु साईबाबा मंदिरातील काकड आरती चालू राहिली पाहिजे. असं मुस्लिम समाजातुन सांगितलं जात आहे. आम्ही सहापुर्वी मशिदीत होणारी अजाण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शिर्डीतील मुस्लिम समाजाची विनंती आहे की, भोंगा वादामुळे साई मंदिरातील बंद झालेली काकड आरती सुरू करावी. शिर्डी तुन राज्यात सर्वधर्मसमभावाचा संदेश जाण्यासाठी ही आरती पुन्हा सुरू करावी असं निवेदनही मशीद ट्रस्टच्या अध्यक्षांकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेली भुमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. राज ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत काल काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. तर दादर मध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतावेळी पोलीस महिलेला दुखापत झाल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. त्यावर आता संदीप देशपांडे यांनी देखील त्यांच्या वरील आरोप फेटाळून लावले आहेत.