करमाळा: उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावरून आता सोलापूर जिल्हा आणि इंदापूर जिल्हयातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. माढ्याचे विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नाहीत. ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिशाभूल करतात असा आरोप माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी शिंदे बंधूंवर केला आहे.आता आमदार संजय शिंदे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईत गेल्यावर माजी आमदार नारायण पाटील हे शिवसेना पक्षाचा आहे, म्हणून सांगतात. सोलापूर जिल्ह्यात परतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मोहिते – पाटील यांचे नेतृत्व मानतात. नारायण आबा पाटलांचा दुटप्पीपणा आता कारमाळ्यातील जनतेने पुरता ओळखला आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे 2004 मध्ये उपमुख्यमंत्री असताना उजनी धरणातून मराठवाड्याला टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय होताना आमदार नारायण आबा पाटील गप्प का बसले होते ? असा सवाल आमदार संजय शिंदे यांनी उपस्थित केला.
उजनी जलाशयातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या योजनेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश निघाले होते. परंतु सोलापूर जिल्हातील काही राजकीय प्रतिनिधींनी या पाण्यासाठी जेवढा विरोध केला तेवढाच विरोध मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी देण्याच्या वेळी करायला हवा होता. सोलापूर जिल्हयाच्या वाटेचे आणि हक्काचे असणारे पाणी वाचले असते,अशी अपेक्षाही आमदार संजय शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तसेच मराठवाड्याला जाणाऱ्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका बसणार आहे असे देखील ते म्हणाले आहेत.