सोलापूर: उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याबाबत नुकतेच सर्वेक्षणाचे आदेश निघाले होते. सर्वेक्षणाचे आदेश निघाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेते, शेतकरी आणि धरणग्रस्तांनी या निर्णया विरोधात मोठे बंड केले आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना हा निर्णय रद्द करावा लागला. हा निर्णय रद्द करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील आठ आमदार,दोन खासदार,सामाजिक संघटना आणि उजनी धरण बचाव समितीने मोठे विरोध केला होता. जनआक्रोशामुळेच हा निर्णय जयंत पाटील यांना रद्द करावा लागला होता.
शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहजी पाटील यांनी देखील उजनीच्या पाण्यावरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्यावरच त्यांनी अत्यंत आक्रमक होऊन टीका केली होती.उजनीच्या पाण्यावरून दस्तुरखुद्द शरद पवार यांच्या विरोधात आंदोलन करू असे वक्तव्य आमदार शहजी पाटील यांनी केले होते. मात्र उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा आदेश रद्द झाल्यानंतर त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.
फक्त शरद पवारच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात देखील त्यांनी अत्यंत आक्रमक होऊन टीका केली होती. उजनीच्या पाण्यासाठी रक्तरंजित लढा उभारू असे वक्तव्य देखील त्यांनी केले होते. सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे नेते दत्ता मामा भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याची नाडी दाबली होती. महाविकास आघाडी सरकारचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न राष्ट्रवादी करीत असल्याचा आरोप आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला होता. आता मात्र त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर न राहता सारवासारव केली आहे आणि पेढे वाटून त्यावर पांघरूण घातले आहे.