राज्यात सध्या महविकासआघाडीचे सरकार आहे. भाजपकडून सध्या या सरकारवर जोरदार टीका होत आहे तसेच हे सरकार फार काळ टिकणार नाही असेही बोलले जात आहे. यांनतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर आपले मत मांडले आहे.
“महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. ज्या सरकारमध्ये एकोपा नसतो एकमेकांना विचारलं जात नाही ते जास्त काळ टिकणार नाही,” असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
राज ठाकरे यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. “लॉकडाउन हटवून सर्व सुरळीत केलं जावं. राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा,” असंही ते म्हणाले.
“मुख्यमंत्री हे शासकीय पदावर आहेत. त्यांनी बाहेर पडून काम केलंच पाहिजे. मला गेले काही महिने मुख्यमंत्री केवळ टिव्हीवरच दिसले. त्यांचा कारभार दिसलाच नाही. आता कुठे ते कामकाजाला सुरूवात करत आहेत. त्याबद्दल काही अधिक बोलावंस वाटत नाही,” असं ते यावेळी म्हणाले.