मध्यरात्रीपासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे मात्र यावर मनसेने अनेक प्रश्न उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे पुणे शहर प्रमुख अजय शिंदे यांनी याबाबत अधिकृतपणे मनसेची भूमिका निवेदनातून मांडली आहे. यात त्यांनी लॉकडाऊनमुळे नागरिक हवालदिल झाल्याची तक्रारही केली.
शहरातील रुग्णांना रुग्णालयात जागा नाही. व्हेंटिलेटर मिळणे मुश्किल झाले असताना सत्ताधारी कशाच्या धुंधित होते? हा लॉकडाऊन जनतेला आर्थिक अडचणीत आणणारा आहे. व्यावसायिक तर लॉकडाऊनमुळे हवालदिल होतील आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कामगार त्यापेक्षा अधिक अडचणीत येतील,” असे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
मनसेने म्हटले आहे, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपासून (13 जुलै) पुणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातून सरकार किती गोंधळलेले आहे हे स्पष्ट होते. राज्याचे मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाही. सरकार नक्की कोण चालवत आहे? हे कोणालाच कळत नाही.”
तसेच “बदल्यातील मानापमान नाट्य आणि नगरसेवक देवाणघेवाण यात सरकारमधील प्रमुख पक्ष व्यस्त आहेत. अशावेळी राज्यातील प्रमुख शहरतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे राज्यकर्त्यांचे लक्षच नव्हते. पुणे शहरात रोज सरासरी 20 मृत्यू आणि रोज 600 ते 1000 रुग्ण वाढ होत आहे. असं असताना सरकार नेमकं कशाच्या अमलाखाली झोपले होते ?” असा सवाल मनसेने केला.