अमरावती: देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दुसऱ्या लाटेत देशात सर्वाधिक मृत्यू झालेत. अनेकांचे रोजगार गेलेत. व्यवसाय बंद पडलेत. अनेकांनी कुटुंबातील कर्ती व्यक्ती गमावली. एकूणच मोदी सरकार देशवासींना भिक्षेला लावण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
जिल्हा दौऱ्यावर असलेले नाना पटोले यांनी शनिवारी (ता. १२) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाची दुसरी लाट येणार याची शास्त्रज्ञांनी कल्पना दिल्यानंतरही मोदी सरकार गाफील राहिले. देशात मृत्यूने कहर केला. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. आतासुद्धा देशात ऑक्सिजन, लशींबाबत केलेले नियोजन फसले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेतसुद्धा मोदी सरकारकडून फारशा अपेक्षा नाहीत, असेही ते म्हणाले. महामारीमुक्त देश हीच काँग्रेसची संकल्पना असून त्यादृष्टीने प्रत्यक्षात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करीत असल्याचे ते म्हणाले.
पीकविमा म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा
पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अटी केंद्र शासनानेच बदलल्या आहेत. अनेक अटी आज गैरलागू आहेत. असे असतानाही महाविकास आघाडीच्या नावाने खडे फोडण्याचा उद्योग भाजप नेते करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.