नवी दिल्ली : देशातल्या अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्सची कमतरता, करोना लसींचा तुडवडा जाणवत आहे. मागील सलग काही दिवस देशातील करोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार गेली आहे. यातच केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांविरोधात उभी ठाकली असून, दोन्हीकडचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार करोनाच्या लढाईत सर्व राज्य सरकारांसोबत आहे. केंद्र राज्यांमध्ये कोणताही भेदभाव करत नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, प.बंगालच्या निवडणूक दौऱ्यावरून परतल्यानंतरही, दिवसातील १७ ते १८ तास काम करत आहेत, असे सांगत त्यांनी करोनाच्या परिस्थितीवरून कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन केले आहे.
तसेच त्यांनी एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितले की, ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ ट्रेन चालवण्याच्या दृष्टीतून ग्रीन कॉरिडोअर तयार केला जात आहे. दरम्यान, ६ हजार १७७ मेट्रीक टन ऑक्सिजन हा करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांमध्ये पुरवला जाणार असून, सर्वाधिक पुरवठा म्हणजे दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला देण्यात येणार आहे, अशी माहितीही गोयल यांनी यावेळी दिली.