राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. यानंतर पुण्याचे खासदार गिरीश बापट हा निर्णय आमदार, खासदारांना विचारात घेऊन घेतला नसल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या बदलीवरून सरकारवर टीका केली आहे.
गिरीश बापट यांनी फेसबुक पोस्टद्वारे बदलीचा विरोध केला आहे. त्यांनी लिहिले की, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यांना सरकारने बळीचा बकरा बनवले. गेल्या काही महिन्यात कोरोना संक्रमण रोखण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना असे अचानक बदलणे योग्य नाही. सरकार आम्हाला राजकारण करू नका असे एकीकडे सांगताना असे निर्णय राजकीय अभिनिवेशातून घेतले आहेत काय अशी मला शंका यायला लागली आहे. पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने असे धरसोडीचे राजकारण राज्य सरकार करू लागले आहे. आधी अचानक लॉकडाऊन आणि आता प्रमुख अधिकाऱ्यांची बदली ही चुकीची गोष्ट करण्याची मालिका आहे.
दरम्यान, पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र अशातच आयुक्त शेखर गायकवाड यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे.