मुंबई: मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबई महापालिकेनं अलीकडेच १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. मात्र, पहिल्याच पावसात पालिकेचा हा दावा फोल ठरला आहे. पहिल्याच पावसात मुंबईची अवस्था दैनिय झाली आहे, विरोधकाडून महापालिकेच्या कारभारावर टिकेची झोड उठवत आहेत. हजारो कोटींचा खर्च करूनही मुंबईतील नालेसफाईचा प्रश्न सुटत नाही. मी सुद्धा काल मुंबईत अडकलो होतो. मुंबईची तुंबई होतेय हे खरं आहे, येत्या पालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
चंद्रकांत पाटील वाढदिवसा निमित्त मीडियाशी बोलताना म्हणाले की, १०४ टक्के नालेसफाईचे काम झाले आहे, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. परतू पहिल्याच पावसात हा दावा फोल ठरला आहे. महापालिकेचा हजारो कोटींचा खर्च करुन नालेसफाईचा प्रश्न सुटत नसेल, तर मुंबईकर आता शिवसेनेला महापालिका निवडणुकीत नक्कीच त्यांची जागा दाखवून देणार आहे. असे विधान करत भाजपा प्रदेशाध्यक्षा चंद्रकांत पाटील यांनी सेनेवर टिका शस्त्र सोडले.
मुंबई पालिकेने शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात १०० टक्क्यांहून अधिक नालेसफाई केल्याचा दावा केला आहे. पावसाळा सुरू होत असतानाच, मुंबईकरांची समस्या दूर करण्यासाठी पालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाई केल्याचे म्हटले होते. तसंच, पालिकेने मिठी नदीतील ८० टक्के आणि मोठ्या नाल्यांतून ३० टक्क्यांपर्यंत जादा गाळ काढल्याचे म्हटले आहे. मात्र पालिकेच्या या दाव्यावर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे.
मुंबईची तुंबई
मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. पहिल्याच पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली आहे. सकाळीच कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ होती. मुंबई व उपनगरासाठी २४ तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईत आणि उपनगरात काल सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला होता.
पहिले चार-पाच दिवस मुंबई ठप्प राहायची, पण आता
मुंबईतील तुंबणाऱ्या पावसाविषयी किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘पहिले पावसाचे पाणी तुंबले तर चार- पाच दिवस मुंबई ठप्प झालेली राहायची. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही मुंबईतल्या सर्व भागांवर लक्ष ठेवत आहोत. ज्या ठिकाणी निष्काळजीपणा दिसेल तिथे तात्काळ कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षीपासून मनुष्यबळ विस्कळीत झालं आहे. मात्र हे कारण आम्ही देणार नाही. मुंबईत चार तासांहून अधिक काळ पाणी साचणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेणार असल्याचेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.