चंद्रपूर : राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. दर दिवसाला राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या ६० हजारांवर जात आहे. परिणामी आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. अशा हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, लसींच्या कमतरतेमुळे राज्यभरात रुग्णांचे हाल होत असून, यावरून राज्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शुक्रवारी मुंडे भावंडांमध्ये या पार्श्वभूमीवर झालेले ट्विटर युद्ध ताजे असतानाच, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील राज्य सरकारला चंद्रपूर-गडचिरोलीला झालेल्या इनजेक्शन्सच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून इशारा दिला आहे.
त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, अनेकवेळा माननीय मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागणी करूनही, चंद्रपूरला इंजेक्शन्सचा पुरवठा करण्याच्या निर्णयाला फक्त सकारत्मक प्रतिसाद दिला जातो, मात्र सकारत्मक निर्णय घेण्यास विलंब होत आहे. चंद्रपूर-गडचिरोलीला उद्या तातडीने २००० इंजेक्शन्सची गरज आहे, तसे पत्र देखील मी माननीय शिंगणेजींना पाठवले आहे. मात्र तातडीने उद्या हा पुरवठा न झाल्यास नाईलाजाने आम्हाला या विरोधात उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच यावेळी, जिथे वजनदार मंत्री आहेत, तिथे लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे, मात्र राज्याला जास्त प्रमाणात वीज निर्माण करणाऱ्या, परिणामी राज्यातल्या नागरिकांच्या आणि व्यावसायिकांच्या जीवनातला अंधार दूर करणाऱ्या चंद्रपूर आणि राज्याला सर्वात जास्त नैसर्गिक ऑक्सिजनचा अनमोल साठा देणाऱ्या, दुर्गम भागांपैकी एक असणाऱ्या गडचिरोलीला मात्र सगळ्या गोष्टींमध्ये मागे ठेवले जाते, हा आमच्यावरच अन्याय आहे, असे म्हणत उद्या जर तातडीने चंद्रपूर आणि गडचिरोलीला २००० इंजेक्शन्सचा पुरवठा न झाल्यास आम्हाला सरकारशी संघर्ष करावा लागेल असा स्पष्ट इशारा त्यांनी राज्य सरकार दिला आहे.