पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवरच होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेत प्रभाग किती सदस्यांचा याची उत्सुकता होती. पुणे महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने लढवली जाण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर याचा लाभ कोणाला याची चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोघांनी ‘आगामी महापौर आमचाच’ असा विश्वास व्यक्त केला आहे. कॉंग्रेसमध्ये मात्र मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रवीण दरेकरांना रंगलेल्या गालाचा ‘मुका’ प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांकडून एफआयआर दाखल
राज्य निवडणूक आयोगाने एकचा प्रभाग गृहीत धरून प्रभाग रचना करण्याचे काम सुरू केले होते. यामुळे सर्वच पक्षांची धास्ती वाढली होती. एक प्रभाग रचना ठेवली असती तर महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचे पत्ता कापला गेला असता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी पुण्यात द्विसदस्यी प्रभाग पद्धतीचे सूतोवाच केले होते. सन २०१७ च्या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेत पहिल्यांदाच पुण्याची महापालिका जिंकली होती. मात्र, आता ‘ना भाजपाच्या मनासारखे, ना राष्ट्रवादीच्या मना’सारखे असे झाल्याने निवडणुकीतली चुरस वाढली आहे.
सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी; चंद्रकात पाटलांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली
कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की, गुरुवारी प्रदेश कार्यकारिणीची मुंबईत बैठक आहे. त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन देण्यात येणार आहे. याआधीच्या भाजपा सरकारने चार सदस्यांचा प्रभाग केला. त्यात त्यांचे राजकारण साधले; मात्र शहर विकासाची वाट लागली. त्यामुळे एक किंवा दोन सदस्यांचा प्रभाग करावा, अशी मागणी काँग्रेस सरकारला करणार आहे. कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी सांगितले, “महाआघाडी सरकारने वेळीच प्रभाग रचनेचा निर्णय घेतल्याने आभार मानतो. या निवडणुकीतही तिन्ही पक्षांची आघाडी झाली तर तिघांना एक-एक जागा मिळेल.”
प्रभाग कितीचाही असो, महापौर आमचाच
“अजित पवार नेहमीच कार्यकर्त्यांना सांगतात, प्रभाग रचना कशी झाली तरी प्रत्येकाची निवडून येण्याची ताकद असली पाहिजे. त्यामुळे प्रभाग रचना एकची होवो की, दोन-तीनची; पण यावेळी पुणे महापालिकेत ‘राष्ट्रवादी’चीच सत्ता येऊन आमचाच महापौर होणार याबाबत काही शंका नाही. पुणेकरांनी भाजपचा कारभार पाहिला आहे आणि आमची तयारी पूर्ण झाली आहे. पुणेकर आम्हालाच निवडून देतील”, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशात जगताप यांनी सांगितले.
पुणेकरांचा विश्वास आमच्यावर
“हा निर्णय घ्यायला राज्य सरकारने उशीरच केला. सत्तेतल्या तिन्ही पक्षांत कुठल्याही विषयात एकवाक्यता नसल्याने ही दिरंगाई अपेक्षित होती. पुण्यात प्रभाग कितीचा आणि कसाही झाला तरी पुणेकरांचा कौल भाजपलाच मिळेल असा ठाम विश्वास आहे. पाच वर्षांपूर्वी पुणेकरांनी टाकलेला विश्वास मेट्रो, भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, पुणे विकास आराखडा, आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण आदींमधून आम्ही सार्थ ठरवला आहे”, असं भाजप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
शिवसेनेशिवाय महापौर नाही
“शासनाने चार सदस्यीय प्रभाग रचना रद्द केली हे खूप चांगले झाले. चारच्या प्रभाग रचनेत भाजप सोडून सर्वांची प्रचंड वाताहत झाली होती. आता तीनचा प्रभाग झाला आहे. यात कोणी कितीही दावे केले तरी शिवसेनेच्या मदतीशिवाय महापालिकेत कोणाचीच सत्ता येऊ शकत नाही आणि कोणाचाच महापौरही होणे कठीण आहे”, असं शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले.
Read Also :
- २०२२ च्या महापालिका निवडणुकासाठी 3 सदस्यांचा प्रभाग होणार; राज्य मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय
- किरीट सोमय्यांचा पुन्हा कोल्हापूरला येण्याचा मुहूर्त ठरला; राजकीय वाद पेटण्याची शक्यता
- उद्धव ठाकरेंचे सल्लागार, अधिकारी अतिशय अपरिपक्व; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक
- राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर, सावित्रींच्या लेकींचे गाऱ्हाणे ‘मातोश्री ‘ ऐकणार का? – महिला आमदाराचे पत्र
- मी कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही, सोमय्या विनाकारण प्रतिमा मलिन करतायतं – अनिल परब