पुणे : महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे, सत्ताधारी भाजपकडून ‘ॲक्शन मोडमध्ये’आला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या वतीने समर्थ बुथ अभियानाची जोरदार तयारी केली जात आहे. पक्षाला अधिक बळकटीसाठी हे अभियान यशस्वी करण्याचे आदेश पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नवीन कार्यकारणी कधी जाहीर होणार याची प्रतिक्षा करीत आहेत. तर काँग्रेसला अद्याप नवीन शहराध्यक्षाची प्रतिक्षा लागली आहे.
पुणे महापालिकेची निवडणुक फेब्रुवारी- मार्च २०२२ ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर अडीच वर्षानंतर विधानसभा, लोकसभा निवडणुक होतील. या निवडणुकांत पक्षाचे स्थान बळकट रहावे यासाठी भाजपकडून बुथ निहाय कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाते. पाच हजार मतदारांमागे एक शक्ती केंद्र प्रमुख त्यानंतर बुथ प्रमुख आणि प्रत्येक बुथ प्रमुखाच्या खाली तीस कार्यकर्त्यांची समिती काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापर्यंत हे समर्थ बुथ अभियान राबविले जाणार आहे. या अभियानातंर्गत सदर बुथ समितीपर्यंतची रचना पुर्ण केली जाणार आहे. यादृष्टीने पक्षाच्या नगरसेवकांची बैठक नुकतीच पार पडली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. समर्थ बुथ अभियानांतर्गत पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य नागरीकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. प्रत्येक नगरसेवकांने प्रत्येक बुथ हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश देताना भारतीय यांनी नगरसेवक आपली जबाबदारी पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
एकीकडे भाजपकडून बुथ समितींच्या रचनेवर काम करण्यास सुरुवात झाली असताना, विरोधी पक्षांमध्ये विशेष प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नवीन कार्यकारणी कधी जाहीर होणार याची प्रतिक्षा लागली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी जुनी कार्यकारणी बरखास्त केली. नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना कार्यकर्त्याची क्षमता लक्षात घेऊनच त्याला पद देण्याची त्यांची भुमिका आहे. त्यानुसार पदासाठी इच्छुक असणाऱ्यांना काही ‘टास्क’ दिले गेले होते. पक्षाची शहर कार्यकारणी जाहीर करण्यात उशीर होत असल्याची तक्रार केली जाऊ लागली आहे. मात्र, येत्या आठवड्याभरात ही कार्यकारणी जाहीर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून पक्ष बळकटीसाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. काँग्रेसचे शहराध्यक्ष बदलाची चर्चा गेल्या अनेक महीन्यापासून सुरू आहे. या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती झाल्या आहेत. परंतु, अद्याप पक्षाच्या नेतृत्वाने नाव अंतिम केले नाही. याचा परीणाम संघटनात्मक कामावर होत आहे.
Read Also :
- ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयाचा मनमानी कारभार, ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची अचानक हकालपट्टी!
- देवेंद्रजी, तुमची सात भेटली तर बैलगाडा शर्यत लवकर चालू करु – खासदार डॉ. अमोल कोल्हे
- आठवा महिना लागला तरी स्वतःचा पाय स्वतःच्याच धोतरात – शिवसेना
- शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात; १५ कोटींच्या संपत्तीवर आयकर विभागाची टाच
- “आपला अनुभव किती, राजकीय कारकीर्द काय?, रुपालीताई तुमची राजकीय शूर्पणखा होऊ देऊ नका!”