कोल्हापूर: कोल्हापूरचा सत्ता संघर्ष हा अख्या महाराष्ट्राला माहित आहे. कोल्हापूरला राजकीय बदलापूर देखील काहीजण म्हणतात. इथं प्रत्येक पराभवाची परतफेड समोरच्यांकडून केली जाते असा इतिहास आहे. या इतिहासाला काहीसा छेद देण्याचे काम राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटलांनी केले आहे. मुन्ना महाडिक यांच्या कुटुंबातील सर्वच पदे घालविण्याचा पराक्रम बंटी पाटलांनी केला आहे. गोकुळ असे, विधानसभा असे किंवा लोकसभा असो. प्रत्येक पदावरून महाडिकांना त्यांनी कात्रजचा घाट यावेळी दाखवला आहे. आता शेवटची परीक्षा घेतली जाणार आहे आणि ती म्हणजे विधानपरिषद निवडणूक. कोल्हापूरचे पालकमंत्री असणाऱ्या सतेज पाटलांविरुद्ध प्रबळ उमेदवार म्हणून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कुटुंबातील उमेदवार देण्याचे संकेत काहीसे निर्माण झालेले आहेत.
विधानसभा निवडणूक, शिक्षक, पदवीधर, गोकुळच्या निवडणुकीत पीछेहाट झालेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या होम ग्राउंडवर त्यांची देखील आता प्रतिष्ठा पणाला लागणार हे मात्र नक्की. विधान परिषद निवडणुकीचा बिगूल वाजल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा ६३ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर आता गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यात आणि राज्यातीलही राजकीय संदर्भ बदलले आहेत, त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटतील.
विशेषतः राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवताना शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली, तेव्हापासून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडीला धूळ चारण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मंत्र्यांविरोधातील या निवडणुकीतील लढतीकडे राज्याचे लक्ष असेल.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
सद्यस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार भाजपकडे दिसत नाही. महादेवराव महाडिक यांच्या वयाचा विचार करता ते रिंगणात उतरतील की नाही? याविषयी संभ्रमावस्था आहे; पण त्यांच्याशिवाय या निवडणुकीत रंगत नाही, त्यामुळेच त्यांच्याऐवजी त्यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.
हे पण वाचा, न्यायालयाची शेतकरी कायद्यांना स्थगिती, मात्र लढाई अजून संपलेली नाही – सतेज पाटील