पुणे: खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांची आज पुणे भेट झाली आहे. याभेट दरम्यान उदयनराजे यांनी १६ तारखेला कोल्हापूर मध्ये संभाजीराजे यांच्या काढण्यात येणाऱ्या मराठा मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच यावेळी उदयन राजे म्हणाले की, मराठा आरक्षण देणे ही जबाबदारी ठाकरे सरकारची आहे, जर ठाकरे सरकारने वेळीच योग्य निर्णय नाही घेतला तर उद्रेक होईल असा इशाराही उदयनराजेंनी दिला.
‘या देशाची फाळणी करायची आहे का, असा माझ्या राज्य आणि केंद्रावर आरोप आहे. २३ मार्चला जीआर काढून आरक्षण दिलं जात आहे. मग मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्या. मराठा समाज आणि ओबीसीमध्ये दुफळी निर्माण केली जात आहे’ असा आरोपही उदयनराजे यांनी केला.
‘व्यक्तिगत स्वार्थासाठी समाजामध्ये दुफळी निर्माण होईल, आम्ही कोणतेही कृत्य कधी केले नाही. कोर्टात काय होईल, काय निर्णय येईल, याकडेच यांचं लक्ष आहे. यांना समाजाशी काही घेणे देणे नाही. व्यक्ती केंद्रीत राजकारणी झाले आहे. आज यामुळे मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला तर याला सरकारच जबाबदार राहणार आहे. मी आणि संभाजीराजे सुद्धा तेव्हा काही करू शकणार नाही. आमच्यावर सुद्धा घणाघात हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे अशी वेळ येऊ देऊ नका’ असा इशाराही राजेंनी दिला.
‘जेवढे राज्यकर्ते आहे ना आजपर्यंत त्यांना खूप मुभा दिली आहे. आपण निवडून आलो आहे, त्यांना खूप काही वाटतंय. आता या लोकशाहीतील या राजे म्हणून घेणाऱ्यांनी नीट वागले पाहिजे. माझं तर म्हणणं आहे, यांना गाडलं पाहिजे. वाटलं तर माझ्यापासून सुरुवात करा. माझ्याकडे जशी विचारणा करणार आहात, तसंच प्रत्येक आमदार आणि खासदाराला याचा जाब विचारला पाहिजे’ असंही उदयनराजे म्हणाले.