‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी गणेशोत्सवाला कात्री लावायचे ठरवले आहे. पुणे, मुंबईसह अनेक शहरातील लोक गणेशोत्सवासाठी गावी जातात. त्यांना गावी जाण्यास बंदी घातली तर आम्ही आंदोलन करू असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांच्यानंतर नारायण राणे यांनीही चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याची मागणी केली. “कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेले चालणार नाही. त्याचे आई, वडील, पत्नी गावी असतात. कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, त्यांना कोणत्याही पासची सक्ती करु नये. कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेईल.” असं नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, “लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट करु नका. कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती.” असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे.