अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. शिवाय त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. नवनीत राणा या २०१९ साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या हेविवेट नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. दरम्यान, दोन वेळा शिवसेनेचे खासदार राहिलेले परंतू २०१९ ला पराभव झालेले आनंदराव आडसूळ याचे आगामी निवडणुकीत पारडे जड ठरणार? की पिंपरी चिंचवड शहराची रणरागिनी मानल्या जाणाऱ्या भाजपच्या ‘वेलसेलट’ असलेल्या स्थायी समितीच्या माजी सभापती तथा जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांना भाजप माहेरी पाठवणार?, आनंदराव आडसूळ विरुद्ध सीमा सावळे यांच्या लढत झाल्यास नेमके कोणाचे पारडे जड ठरणार? अशी चर्चा अमरावतीच्या राजकीय वर्तूळात रंगताना पाहायला मिळत आहे.
सध्याच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या रवी राणा यांच्याशी २०११ साली झालेल्या लग्नामुळे नवनीत राणा यांच्या आयुष्याला एक नवी राजकीय कलाटणी मिळाली. २०१४ साली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी चारवेळा खासदारकीची टर्म भूषविलेले शिवसेनेचे हेविवेट नेते आनंदराव अडसूळ यांच्याशी दोन हात केले. मात्र, या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा ३६००० मतांनी पराभव केला. त्यामुळे नवनीत राणा यांची अमरावती मतदार संघाच्या खासदापदी वर्णी लागली. परंतू, जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने अमरावती मतदारसंघ पुन्हा एकदा नव्याने निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. १९९६ पासून त्यांनी चार वेळा खासदारकीचे पद भूषविले आहे. शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांपैकी एक म्हणजे आनंदराव अडसूळ यांच्याकडे पाहिले जाते. परंतू, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. शिवाय राज्यातील विधानसभा निवणुकीनंतर शिवसेना- भाजप युतीमध्ये फुट पडली आहे. अशावेळी आगामी अमरावती मतदारसंघाच्या निवडणुक उमेदवारीसाठी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसुळांचे शिवसेनेचे टिकीट पक्के असल्याचे मानले जात आहे. परंतू, स्वतंत्र लढत असताना भाजप मात्र मुळच्या दर्यापूर येथील असलेल्या, पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सक्रीय तसेच रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ नगरसेविका व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांना अमरावती निवडणुकीच्या लढतीसाठी भाजप माहेरी पाठवणार? की अन्य चेहरा उभा करणार? यावर प्रश्न चिन्ह आहे.
सीमा सावळे यांचे मुळगांव अमरावतीमधील दर्यापूर आहे. लग्न आणि राजकीय कारकिर्दीमुळे त्यांची ओळख पिेंपरी चिंचवडची रणरागिणी म्हणून झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेवर सीमा सावळे यांनी दोन वेळा शिवसेनेकडून तर एकवेळा भाजपच्या टिकीटावर नगरसेविका पद भूषविले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सीमा सावळे पुर्णत: वेलसेटल झाल्या आहेत. दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या टिकीटावर दर्यापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक होत्या. परंतू, भाजप-शिवसेना युतीमुळे दर्यापूर मतदारसंघ शिवसेनेच्या राखीव ठेवण्यात आला. अशावेळी सीमा सावळे यांनी अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरला. परंतू, प्रतिस्पर्ध्यांच्या लढ्यात सीमा सावळेंना यश मिळाले नाही. आगामी अमरावती निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यास शिवसेनेकडून उभे असलेल्या आडसूळांविरुद्ध लढण्यासाठी भाजप सीमा सांवळे यांना माहेरी पाठवण्यास मदत करणार का? की अन्य उमेदवाराला उभे करणार?, भाजपने मदत केल्यास सीमा सावळे विरुद्ध आनंदराव आडसूळ यांच्यात होणाऱ्या लढतीमध्ये कोणाचे पारडे जड ठरणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.