ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा शिक्षण महर्षी महादेव बाबुराव चौघुले यांचे शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असताना अचानकपणे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले व तीन विवाहित मुली ,चार भाऊ ,पाच भावजयी,नातवंडे ,पतवंडे असा 45 जणांचा एकत्रित परिवार आहे. ते गेल्या 35 वर्षांपासून सक्रिय राजकारण व समाज कार्यात कार्यरत होते. त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून झाला असून त्यांनंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्याने त्यांनी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला व ते सक्रियपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
महादेव चौघुले यांनी ठाणे जि.प.च्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद देखील भूषविले होते. सद्या ते परिविक्षाधीन आणि अनुरक्षण संघटना (बाल सुधारगृह ) महाराष्ट्र राज्य ,पुणे या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी 20 वर्षांपूर्वी साई शिक्षण सेवा समिती या सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून खार्डी (पायगांव) ,वडूनवघर येथे माध्यमिक शाळा तर राहनाळ (अंजूरफाटा ) येथे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय तसेच लॉ आणि बी – फार्मसी कॉलेज सुरू करून शहरासह ग्रामीण भागातील गरीब ,गरजू ,आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था केली आहे. त्यांच्याकडे उत्कृष्ठ वक्तृत्वाची कला अवगत असल्याने ते तासंतास प्रेक्षक अथवा कार्यकर्त्यांना खिळवून ठेवत होते.