मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजपकडून उद्धव ठाकरे यांना धारेवर धरले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत गाडीचं स्टेअरिंग आपल्याकडे असल्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर महाविकास आघाडीमध्ये वातावरण तापलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडे महाविकास आघाडीचा रिमोट असल्याचं बोललं जात होतं. मात्र, शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही. तसंच राज्यातील काही नेते सध्या अस्वस्थ दिसत आहेत, असं शरद पवार म्हणाले.
तसेच मुख्यमंत्र्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. पण थोडं फिरलंही पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे.