येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान, गृहमंत्री, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक 300 जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरु आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचंही नाव असल्याचं कळतं. या सोहळ्याला उद्धव ठाकरे नक्कीच जातील असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना गेल्यावर्षी २५ नोव्हेंबरला अयोध्येत गेले होते. त्यावेळी अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. “ज्यांना स्वतःच्या वडिलांचं गेल्या 5 वर्षांत स्मारक बांधता आलं नाही ते अयोध्येत जाऊन काय राम मंदिर बांधून काय दिवे लावणार,’ असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला होता. आता हा मुद्दा घेऊन भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवार यांचा हा व्हिडीओ ट्विट करत पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन काय दिवे लावणार- अजित पवार pic.twitter.com/sImBYIAYpu
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 21, 2020
दरम्यान, अयोध्या राम मंदिराबाबत शिवसेनेचं भावनिक, धार्मिक आणि राष्ट्रीय नातं आहे. राम मंदिराच्या निर्माणामध्ये शिवसेनेचं कार्य मोठं असल्याने उद्धव ठाकरे भूमिपूजनाला जाणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
आज जे अयोध्येत राम मंदिर निर्माणाचं कार्य होतंय त्यातील जे काही अडथळे होते त्यात शिवसेनेने मोठं बलिदान दिलं आहे, रक्त सांडलं आहे. त्याठिकाणी वारंवार शिवसेनेकडून कोणी ना कोणी जात राहिलं आहे. उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री नसताना अयोध्येला गेले होते. शिवाय, महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यावरही गेले होते. असेही संजय राऊत यांनी सांगितले