नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा धोका अद्याप टळलेला नाही. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे अधिवेशन रद्द करण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
देशभरात कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं मत मांडलं होतं. त्याचबरोबर संसद भवनाचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे आता जानेवारी 2021 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे, असे प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती.
तर हिवाळी अधिवेशन रद्द केल्यानंतर काँग्रेसकडून टीका केली जात आहे. विरोधी पक्षांना विश्वासात घेतले नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे अशी बोंब ठोकत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भाजपा हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. मोदी सरकारने तर कोविडमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्दच केले. मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 15, 2020
काँग्रेस नेते सचिन सांवत यांनी देखील केंद्राच्या या निर्णयावर टीका केली आहे, ‘राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे अशी बोंब ठोकत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भाजपा हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. मोदी सरकारने तर कोविडमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्दच केले. मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार ?’, असे म्हणत भाजपवर निशाणा साधला.