कोरोना काळात च्यवनप्राशचे सेवन करा आणि तंदुरुस्त राहा, असा सल्ला दिला जातो. मात्र, नाशिक शहरात सध्या हेच च्यवनप्राश कोणाला तंदुरस्त राखण्यासाठी आवश्यक आहे, याची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. नाशिक शहराचे महापौर सतीश कुलकर्णी हे कुठेच दिसत नसल्याने मनसेने त्यांच्यावर टीका करत त्यांना च्यवनप्राश भेट दिले होते. मात्र याची खरी गरज मनसेलाच असल्याची टीका भाजपने केली आहे.
त्यावर महापौर सतीश कुलकर्णी यांनी पक्षवाढीसाठी च्यवनप्राशची खरी गरज मनसेलाच असून कार्यकर्त्यांनी ते खाऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे, असा टोलाही मनसेला लगावला. तसेच, “जिल्ह्यात मनसेची मोठी पडझड झाली असून ती सावरण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये ताकद उरली नसून तंदुरुस्त राहण्यासाठी आता पक्षाच्या नेत्यांनीच च्यवनप्राश खाल्ले पाहिजे,” असे मतही महापौरांनी व्यक्त केले. शहरात कोरोनावाढीला मनपा प्रशासन जबाबदार असून महापौर कुठेच दिसत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.
भाजपने तरुण भारताच्या अग्रलेखातून मनसेने निशाणा साधला आहे, “नाशिकमध्ये राजकीय वलयच प्राप्त झाले. च्यवनप्राश विकत घेण्यास गेल्यास कोणासारखे तंदुरुस्त व्हायचे आहे, भाजप की मनसे? असा विनोदाने सवाल केला जात आहे.आज भाजप सत्तेत ‘आहे.’ यापूर्वी मनसे सत्तेत ‘होती.’ यातील ‘आहे’ आणि ‘होती’मधील फरक हा नागरिकांनीच मतदानाच्या रूपाने दाखवून दिला आहे. तेव्हा इंजिनाने वयाचे आणि त्यांच्या आजवरच्या अनुभवाचे व योगदानाचे भान बाळगत तरी शहराच्या प्रथम नागरिकांशी वर्तन करणे आवश्यक होते असेच यानिमित्ताने वाटते. असो… शेवटी मुद्दा हाच आहे की, कोणीही कोणाला काहीही भेट द्या, अथवा सल्ले द्या, मात्र कोरोनाच्या भयानक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करा, एवढीच नाशिककरांची इच्छा.”, असे या अग्रलेखात म्हटले आहे.