महाविकासआघाडी सरकार पडणार आहे, जाणार आहे अशा वावड्या उठवणाऱ्यांवर या मुलाखतीनंतर तोंडाला चिकटपट्ट्या लावण्याची वेळ आली आहे, असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीवरुन त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे
विजय वडेट्टीवार म्हणाले, “शरद पवार यांच्या मुलाखतीतून महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार हे स्पष्ट झालं आहे. हे सरकार पडणार, जाणार अशा वावड्या उठवणाऱ्यांनी आता तोंडाला चिकटपट्टी लावण्याची वेळ आली. वावड्या उठवणाऱ्यांना शरद पवार यांच्या मुलाखतीतून सरकार जाणार नाही, त्यांना विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवा हा स्पष्ट संदेश मिळाला आहे.”
“जेव्हा तीन वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन होतं तेव्हा ते अपघाताने होत नाही, तर विचारपूर्वक होतं. ज्याचा त्याचा स्वतःचा अजेंडा असतो, स्वतंत्र विचार असतो, विचारधारा असते. हे सर्व पाहता अशा गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतात. त्याचे परिणाम चांगले आणि वाईट होत असतात. कोणताही पक्ष आपल्या पक्षाचं नुकसान होईल असा निर्णय घेत नाही. त्यामुळेच तो निर्णय घेतला गेला,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.