राजस्थानात ऑपरेशन लोटस राबवण्यासाठी महाराष्ट्र भाजपाने मुंबईतल्या व्यावसायिक आणि बिल्डर यांच्याकडून ५०० कोटी जमवले आणि ते राजस्थानला पाठवले. असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कालच केला होता. या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
“महाराष्ट्र भाजपावर ज्या कुणी राजस्थान नाट्यासाठी ५०० कोटी जमवल्याचा आरोप केला आहे तो कुणी लावला मला मला ठाऊक नाही कारण मी दिल्लीत होतो. पण ज्या कोणत्या काँग्रेस नेत्याने हा आरोप केला आहे त्याची आधी मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करुन घ्या. असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी सचिन सावंत यांच्यावर केला आहे.
फडणवीस म्हणाले,”प्रसिद्धीसाठी काँग्रेसचे नेते काहीही बडबड करतात. यांचे आरोप कुणाला खरे वाटणार? असं कुठे घडतं का? खरंच मला वाटतं की ज्या काँग्रेस नेत्याने हा आरोप लावला आहे त्याला चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे.”
काँग्रेसने आधी आपली तिघाडी सांभाळावी, भाजपाची चिंता करु नये आम्ही आमच्या जागी भक्कम आहोत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे. काँग्रेसने आधी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं तो पक्ष नीट सांभाळावा. महाराष्ट्र भाजपातले काही नेते आमच्या संपर्कात आहेत असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला होता. या दाव्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. करोनाच्या काळात महाराष्ट्राची काय अवस्था तीन पक्षांच्या सरकारने केली आहे आधी ते बघा असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.