आपल्याला राज्यात सध्या सत्तेवर असणारं महाविकासआघाडी सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही, असं म्हणत हे सरकार त्यांच्यातील अंतर्विरोधामुळेच पडेल असा सूर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आळवला. ठाणे येथे एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणाही साधल्याचं पाहायला मिळालं. शिवाय यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना निशाण्यावर घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असल्याचं अनेकदा म्हटलं गेलं याबाबतच फडणवीस यांनी आपली बाजू स्पष्ट केली. सरकारचं अपयश झाकायचं असेल तेव्हा संजय राऊत सरकार पाडण्याबाबत लेख लिहून लक्ष वळवतात, असं म्हणत त्यांनी राऊतांवर बोचरी टीका केली.
फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यासोबतच राज्यातील आणि विशेष म्हणजे ठाण्यामध्ये अतिशय झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी राज्य सराकरनं कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवण्याची विनंतीही त्यांनी शासनाकडे केली.