उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख उस्मानाबादला २६ मे नंतर फिरकले नाहीत. कोरोनाच्या महामारीत पालकमंत्री गडाख गायब असल्याने सरकारी बाबूवर शासकीय यंत्रणा मनमानीपणा करीत आहे. त्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शहरात विविध भागात उस्मानाबादचे पालकमंत्री हरवले आहेत, उस्मानाबादला पालकमंत्री पाहिजेत असे पोस्टर लावले होते. यामुळे पोलिसांनी पाच मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यानंतर पालकमंत्री गडाख यांनी त्यावर खुलासा केला आहे.
गेल्या एक महिन्यापासून माझ्या कुटुंबातील सदस्याचे आजारपणाच्या विविध टेस्ट अहमदनगर, पुणे, चेन्नई व मुंबई येथे चालू असल्याने एक महिन्यापासून मी जिल्ह्यात येऊ शकलो नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु, सर्व सामान्य जनतेला अडचण येऊ नये. म्हणून मी जिल्हा प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधींच्या व जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या संपर्कात आहे. तसेच फोनद्वारे अनेकांच्या कामाचा पाठपुरावा चालू होता. एखाद्या ठिकाणी आर्थिक अडचण असेल किंवा अन्य कोणती अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी त्याचा पाठपुरावा करीत आहे. आई तुळजाभवानीच्या कृपेने कुटुंबातील आरोग्याचा प्रश्न पार पडेलच. परंतु अनेकांना माझ्या कुटुंबातील आरोग्याचा प्रश्न माहीत असूनही त्यांनी खालच्या पातळीचे राजकारण केले याचा खेद वाटतो. शेवटी, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. त्यामुळे पुढील आठवड्यात प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार आहे. असे पालकमंत्री गडाख यांनी स्पष्ट केले.