अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडून शिवसेनेला शह देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेनं कल्याणमध्ये मात दिली होती. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाराजी आहे, अशा बऱ्याच अफवांचे पिक आले. अखेरीस हे नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. शिवसेनेतून फुटलेले नगरसेवक पुन्हा शिवसेनेत येईपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या.
मात्र अजूनही या नगरसेवकांचे नाराजी नाट्य सुरूच असल्याचे समोर आले आहे. आता शिवसेनेत परतलेल्या त्या नगरसेवकांनी माजी आमदार विजय औटी यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्राद्वारे केली आहे.
पारनेरमध्ये शिवसेनेकडून सलग १५ वर्षे विजय औटी निवडून येत होते. यावेळी मात्र माजी शिवसैनिक व सध्या राष्ट्रवादीकडून आमदार असलेले निलेश लंके यांच्याकडून ते पराभूत झाले. शिवसेनेत नाराज असलेल्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी लंके आग्रही होते.
आता ते नगरसेवक परतले असले तरी त्यांची नाराजी अद्यापही कायम आहे. औटी यांच्यामुळे पक्ष संपण्याची चिन्ह आहेत. असं पत्र नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. तसेच औटी यांची पक्षातून हकालपटटी करून निष्ठावान शिवसैनिकाकडे पक्षाची धुरा सोपवावी अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही, असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे.