अहमदनगरमधील पारनेरचे पाच नगरसेवक सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांची मातोश्री’वर शिवसेनेत घरवापसी झाली.
पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र चारच दिवसात त्यांची सेनेत घरवापसी झाली.
“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमची नाराजी नाही. स्थानिक नेतृत्वाला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला. पारनेरचा पाणी प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला”, असं शिवसेनेचे नाराज नगरसेवक म्हणाले होते.
दरम्यान, महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये झालेले हे पक्षांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. त्यांनी अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला होता.