शरद पवार यांनी सामनाच्या मुलाखतीत “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते शिवसेना शैलीत काम करतात, त्यांनी मित्रपक्षांशीही संवाद ठेवायला हवा”, असं नमूद केलं होतं. त्यावर नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सल्ला देतात ती एक सूचना असते, त्या सूचनेचा आदर राज्यात होईल, याची मला खात्री आहे, असं काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं.
नितीन राऊत म्हणाले, “महाराष्ट्र सरकारला कुठलाही धोका नाही. आमचं सरकारही मजबूत स्थितीत आहे. शरद पवार हे सल्ला देतात ती एक सूचना असते, त्या सूचनेचा आदर राज्यात होईल, याची मला खात्री आहे”. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता, उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्षांशी संवाद ठेवावा असंच नमूद केलं.
“कोरोनाच्या संकटाच्या काळात सरकार अस्थिर करणं योग्य नाही, राजस्थानमध्ये भाजपकडून धोकेबाजार सुरु आहे, राजस्थान सरकार अनुभवी नेत्याच्या हातात, आम्ही सरकार वाचवू”, असं नितीन राऊत म्हणाले.